खेड्यापाड्यातल्या लोकांच्या गरजांपासून तुटलेलं पुस्तकी शिक्षण हे शिक्षणच नव्हे, अशी डॉ. श्रीनाथ कलबाग यांची धारणा होती. अशा कुचकामी शिक्षणाला त्यांनी आपल्या विज्ञाननिष्ठ प्रयोगांमधून भक्कम पर्याय उभा केला. ‘ग्रामीण विकासातून तंत्रशिक्षण आणि त्या शिक्षणातून शाश्वत-माणूसकेंद्री ग्रामविकास’ ही त्यांची दृष्टी होती. ही जोडणी करण्यासाठी त्यांनी पुण्याजवळील पाबळ या अवर्षणग्रस्त गावात विज्ञान आश्रमाची स्थापना केली.
गेल्या चाळीस वर्षांत विज्ञान आश्रमाने तंत्रशिक्षणाचे नवनवीन प्रयोग केले. त्यातून शेकडो ग्रामीण युवक-युवतींना स्वत:च्या पायावर उभं केलं. त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्यातून संशोधक वृत्तीचे यशस्वी ग्रामीण उद्योजक घडवले. या उद्योजकांनी ग्रामीण प्रश्नांना हात घातला.
समाजासमोरच्या समस्यांना शिक्षण-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भिडत ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या प्रयोगाची ही गोष्ट आहे. डॉ. कलबागांनंतर विज्ञान आश्रमाचं समर्थ नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्याने सांगितलेली.